गुरुवर्यांचे चरित्र

गुरुवर्य महाराजांविषयी...
ज्ञानेश्वरदास.........



           या भूतलावरती अखिल विश्वाच्या उद्धाराकरिता आणि धर्माचं रक्षण करण्याकरिता संतांच्या विभूती मानव रूप धारण करून अवतार घेत असतात.संत समाजहितासाठी झटत असताना वेद शास्त्र पुराण आणि संस्कृती यांचा विचार करून धर्म संरक्षण आणि आत्मोन्नतीचा मार्ग सामान्य जीवाला दाखवतात.जर या संतांची भेट झाली तर सामान्य जीव हा सामान्य न राहता त्याच रुपांतर विशेष करून देण्याची जबाबदारी संत आपल्यावरती घेतात.आणि सामान्य जीवाच जीवन भगवत्मय करतात.मग अश्या संतांची भेट झाली कि द्वैतभाव निघून जातो,मी देह आहे हे विसरून जातो आणि मी भगवंताचा अंश आहे हि धारणा दृढ होते आणि मी चैतन्य स्वरूप आहे याची जाणीव होते.मग अवघे विश्व भेदरहित दिसते.मग सामान्य जीवात जर संत एवढा बदल घडवतात तर संतांच जीवन कस असेल ते संतच जाणू शकतात म्हणूनच तुकोबाराय सांगतात......

"तुम्ही संत मायबाप कृपावंत | काय मी पतित कीर्ती वाणू ||
  अवतार तुम्हा धराया कारण | उद्धराया जन जड जीव ||"

  संत अवतार धारण केल्यानंतर आपल्या कार्याची दिशा ठरवतात मग काही परंपरेतून शिकवण देतात तर काही स्वतंत्रतेतून शिकवण देतात परंतु सगळ्या संतांच कार्य मात्र एकच असते ते म्हणजे     "जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती"
       अश्याच या भक्ती ज्ञान वैराग्य या त्रिवेणी ऐश्वर्येत संपन्न असलेल्या स्वानंदसुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांच्या परंपरेत एका ज्ञानमहर्षीचा उदय विश्वाच्या कल्याणासाठी झाला ते म्हणजे
    
 विदर्भ माउली गुरुवर्य श्रीसंत वासुदेव महाराज अडगावकर(ज्ञानेश्वरदास ).
  
      गुरुवर्य महाराजांचा जन्म विदर्भात अकोला जिल्ह्यात श्रीक्षेत्र अकोली जहागीर येथे योगीसम्राट समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज यांचे अंतरंग प्राणप्रिय पट्टशिष्य श्रीसंत भास्कर महाराज यांचे सुपुत्र श्री पुंडलिक महाराज जायले आणि माता चंद्र्भागादेवी यांचे पोटी फाल्गुन शुद्ध तृतीया शनिवार दिनांक २४ फेब्रुवारी १९१७ ला झाला.गुरुवर्य महाराजांचे आई वडील फार धर्मनिष्ठ होते आणि वारकरी संतांवरती त्यांची नितांत श्रद्धा होती आणि याच महतपुण्याईने कैवल्यसाम्राज्यचक्रवर्ती साधकांचे मायबाप श्रीगुरु ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरदास रुपात या भगवतभक्तांच्या पोटी अवतार घेतला.गुरुवर्य महाराजांचं बालपण सुरु झाल.लहान वयातच महाराजांनी आपल्या वडिलांकडून शूर,वीर,संत,महंत,धर्म,वेद,शास्त्र,पुराण, याचे धडे घेतले.परंतु गुरुवर्य महाराज म्हणजे साक्षात माउलीच

"तैसी दशेची वाट न पाहता |
वयसेचीये गावा न येता |
बालपणीच सर्वज्ञता
वरी तयाते ||"

गुरुवर्यांच वय अवघ पाच वर्ष.पाचव्या वर्षीच ब्रम्ह्स्वरुपाची प्रचीती गुरुवर्यांनी जनतेला करून दिली.काळगव्हाण येथे रामनवमीच्या दिवशी सकाळी 

"संतचरणरज लागता सहज |
वासनेचे बीज जळोनी जाय ||"

या अभंगावरती तब्बल दोन तास रामजन्माच कीर्तन केल.ते लहान गोंडस रूप पाहून सगळ्यांनी कौतुक केल.पुढे काही दिवसात महाराजांना अंधत्व आल तेव्हा सद्गुरु गजानन महाराज यांनी हकीम रुपात येउन डोळ्यात अंजन घातल आणि कमरेत बांधायला ताईत दिला तेव्हा दृष्टी आली.काही वर्षातच महाराजांना पितृशोक झाला.पुढे महाराज तपश्चर्येला एका अरण्यात गेले तिथे साक्षात्कार झाला कि पंढरपूरला जा आणि महाराज पंढरपूरला आले तिथून पुढे आळंदीत आले माउलीच्या समाधीवरची माळ घातली,ज्ञानेश्वरीचे १०८ पारायण केले आणि सद्गुरु जोग महाराज संस्थेत पाठाला बसले.एकदा पाठ सुरु असताना गुरुनामगुरू वै.लक्ष्मण महाराज इगतपुरीकर यांनी ज्ञानेश्वरीतील एक ओवी विचारली ती कोण्याच विद्यार्थ्याला येत नव्हती ती गुरुवर्य महाराजांनी म्हणून दाखवली.

"अर्जुना देवूनी समाधी |
  सवेचि घातला निर्वाणयुद्धी
परी कृष्णकृपानिधी |
  तटस्थ त्रिशुद्धी न करीच ||"

गुरुवर्य लक्ष्मण महाराज म्हटले हि ओवी अशी नाही परंतु गुरुवर्य महाराजांचं त्या ओवीबद्दलच ठाम मत पाहून जवळ घेतल आणि प्रेमान कुर्वाळल.संस्थेचा ४ वर्षाचा अभ्यासक्रम एकाच वर्षी पूर्ण केला.पुढे महाराज वेदाभ्यासाचे धडे घेण्याकरिता बनारसला योगेश्वरजी झा यांच्याकडे गेले.त्यांच्याबरोबर वैकुंठवासी गुरुवर्य धुंडा महाराज देगलूरकर आणि वैकुंठवासी गुरुवर्य श्रीकृष्णदास महाराज लोहिया हे पाठाला सोबत होते. त्यानंतर गुरुवर्य महाराजांनी श्रीसंत गोमाजी महाराज संस्थान नागझरी येथे वारकरी शिक्षण संस्थेत प्राचार्याचे कार्य केले. तेव्हा शेगावला सद्गरु गौरीशंकर महाराजांची भेट झाली आणि गौरीशंकर महाराजांनी भास्कर महाराज समाधी मंदिर श्रीक्षेत्र अडगाव याचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा केली.
       त्या समाधीचा जीर्णोद्धार गुरुवर्य महाराजांनी चैत्र कृष्ण पंचमी भास्कर महाराज समाधी सोहळा १९५५ ला केला त्यावेळी जागराच कीर्तन गुरुवर्य मामासाहेबांनी "हेचि दान देगा देवा" या अभंगावर केल तेव्हा या डोळ्याच पारण फेडणाऱ्या सोहळ्याला ११०० संत आणि ४०००० वारकरी उपस्थित होते.पुढे गजानन महाराजांचे एकनिष्ठ भक्त गुरुवर्य पुंडलिक महाराज भोकरे यांच्या उपस्थितीत श्री संत गजानन महाराजांनी सजल केलेली विहीर
"त्रीभूवनैक पवित्र श्रीतीर्थ पुष्करिणी" शेत सर्वे न.५२ श्रीक्षेत्र आकोली जहागीर याचा जीर्णोद्धार केला.

        महाराजांचं कार्य पाहून नेपाळ नरेशांचे गुरु योगी नरहरिनाथ शास्त्री गुरुवर्याच्या भेटीला आलेत आणि भास्कर महाराज संस्थान अडगाव येथे योगी परिषद पार पडली.गुरुवर्य महाराज राजवैद्य असल्यामुळे पुढे वाशिंग्टन येथून medicle research मध्ये काम करा म्हणून पत्र आल परंतु महाराजांनी ते नाकारलं.नंतर महाराजांवरती ३ वेळा विषप्रयोग झाला.परंतु "विष ते अमृत आघात ते हित" याप्रमाणे ते विष पचवल.गुरुवर्य महाराजांनी आपल्या अवतार कार्यात ३७ ग्रंथाची निर्मिती केली.आणि महाराजांचं हे संशोधनपूर्ण लिखाण पाहून गुरुवर्य महाराज लिखित जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज चरित्र हे रशियन भाषेत तयार करण्याची परवानगी मागितली आणि माउलीप्रमाणे


"जे पुरुषार्थ सिद्धी चौथी |
घेवोनिया आपुल्या हाती |
रिघाला भक्तीपंथी |
जगा देतु ||"

अश्या अवस्थेत हा महात्मा सर्व ऐश्वर्य सांडून भगवतभक्तीची ज्ञानस्वरूप पाटी आपल्या डोईवर घेऊन

"हे विश्वची माझे घर |
ऐशी मती जयाची स्थिर |
किंबहुना चराचर |
आपणची जाहला ||"

आपल्याला आलेल्या भगवतभक्तीचा अनुभव जगाला देण्याकरिता चंदनाप्रमाणे झटला.

"अनुभवे आले अंगा | ते या जगा देत असो ||"
"सेवितो हा रस वाटितो आणिका | घ्यारे होऊ नका रानभरी ||"

वासुदेव माउलीच्या जीवनाकडे जर बघितल तर ज्ञानोबारायांच ज्ञान,नामदेवरायांची भक्ती,नाथ बाबांची शांती,तुकोबारायांच वैराग्य आणि निळोबारायांच शिष्यत्व ह्या सगळ्या बाबी त्यांनी अंगीकारल्या.सिद्धबेट मुक्तीचा लढा कायद्याच्या चौकटीतून पूर्णत्वाला नेला आणि वारकर्यांना विजय मिळवून दिला.गुरुवर्य महाराजांची मौलिक शिकवण म्हणजे….

"सर्वं खल्विदं ब्रम्ह"...
"देश काळ वस्तू
 भेद मावळला |
आत्मा निर्वाळीला
 विश्वाकारे ||"

संपूर्ण मानवजात हि एक असून कोणीही भेदाभेद माणू नये.आपण सगळे भाऊ आहोत म्हणून मोठ्या आनंदात सगळे नांदा.जगात एकच देव आहे तो म्हणजे तुमचा आत्मदेव आहे "ज्ञानदेव म्हणे भज आत्मदेवा | अखंडित सेवा करा त्याची ||" माणसाला बाट नाही,विटाळ नाही,भेद नाही,जात नाही.जगात कोणी श्रेष्ठ नाही कोणी कनिष्ठ नाही,कोणी ज्ञानी नाही कोणी अज्ञानी नाही.


"एकापासोनी अवघे झाले |
त्यासी पाहिजे सांभाळिले ||"

आपण हिंदू आहोत आणि कृषिप्रधान देशात वास्तव्य करतो म्हणून निदान १ हेक्टर जमीन तरी प्रत्येकाला असायलाच पाहिजे.आपल दैवत गोमाता आहे तिला प्रसन्न ठेवा,प्रत्येकाच्या घरी तुळसी वृंदावन असलच पाहिजे.आणि हिंदू धर्माचं प्रतिक म्हणून प्रत्येकाच्या घरावरती एक तरी पताका असावी घरात वावरत असताना वातावरण पवित्र ठेवा.कोणाचाही द्वेष करू नका.प्रारब्धवाद सोडा आणि प्रयत्नवाद घ्या.आचरण शुद्ध ठेवा.गळ्यात तुळशीची माळ घाला गोपी चंदन टिळा लावा आणि शेवटचा श्वास असेपर्यंत आळंदी पंढरी देहू ची वारी सोडू नका.वर्ण आणि धर्म हे दोन अंग आपल्याला जातीयतेत स्वार्थांगासाठी अडकवतात त्यांना कायमची मूठमाती द्या पण माणुसकीची शिकवण धरा.धर्म सांभाळा,रात्र वैऱ्याची आहे म्हणून इतिहास जपा,इतिहास जपा,इतिहास जपा" अशी शिकवण गुरूवर्यांनी दिली.महाराजांची वाणी तपश्चर्येची एवढी परिपक्व होती कि

"ते सिद्धप्रज्ञेचेनि लाभे |
मनची सारस्वता दुभे |
सकळही शास्त्रे स्वयंभे |
निघती मुखे ||"
"छंद हरीच्या नामाचा |
शुचिर्भूत सदा वाचा ||"

गुरुवर्य महाराज एकदा कीर्तनाला बसले कि अस रूप असायचं कि डोळ्यात साठवावं आणि मनात आठवावं
"गोड तुमचे रूप दृष्टी | गोड पोटी प्रेम ते ||"


      उदारत्व :

         कीर्तन,प्रवचनात गुरुवर्य महाराज नेहमी सांगत होते कि "आजपर्यंत संतांच्या कृपेने जे काही निर्माण झालेलं आहे ते सर्वस्वी आमजनतेच्या सहकार्यातून आणि आमजनतेकरिताच केलेलं आहे आणि याचे खरे मालक हे सद्गुरु गजानन महाराज आहेत
एके दिवशी हे वाक्य महाराजांनी सार्थ ठरवल आणि एका क्षणात निर्णय घेतला. अडगाव येथील श्रीसंत भास्कर महाराज संजीवन समाधी मंदिर, तेथील धर्मशाळा, सभामंडप, अकोली जहागीर येथील श्रींनी सजल केलेली विहीर, तेथील मंदिर, गावातील ३ मजली गुरु-शिष्य भव्य दिव्य मंदिर, आळंदी येथील धर्मशाळा याशिवाय बेलुरा, अडगाव, अकोली जहागीर येथील कोटयावधी किमतीची शेतजमीन अस सर्व एकत्र करून कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता  "श्रीसंत गजानन महाराज संस्थान शेगाव" यांना सन २००२ साली चैत्र कृष्ण पंचमी श्रीसंत भास्कर महाराज संजीवन समाधी सोहळ्यात हजारो भक्तांच्या समक्ष विलीन केली. आणि शेवटच्या क्षणा पर्यंत प्रत्येक एकादशीला श्रीक्षेत्र भास्करनगर येथे कीर्तन केले.



"देवासाठी घेवोनिया जोग | अवघा भोग त्यजीयला ||"


     गुरुवर्य मोठे बाबा दरवर्षी गुरुवर्य महाराजांच्याअभिष्टचिंतन सोहोळ्याला यायचे तेव्हा
मोठे बाबा संस्थेचे विद्यार्थी या नात्याने प्रवचनातून गुरुवर्य महाराजांचं कौतुक करायचे कि "आमचे वासुदेव महाराज म्हणजे दैवी शक्ती आहे,संत आहेत आणि जोगमहाराज परंपरेच महान वैभव आहेत.त्यांचा हा सोहोळा म्हणजे त्यांच्या कार्याची पावती आहे.

       साधकांचे मायबाप सद्गुरु मारोती बाबा कुऱ्हेकर सांगतात कि "वासुदेव महाराज माउलीप्रमाणे जीवन जगले.आणि माउलीची जशी ज्ञानेश्वरी आहे तस वासुदेव महाराजांचं जीवन आहे.ज्ञानेश्वरी वाचणारे भरपूर आहेत पण ज्ञानेश्वरी जगणारा महात्मा म्हणजे गुरुवर्य वासुदेव महाराज" ...

"श्री संताचिये माथा चरणावरी | साष्टांग हे करी दंडवत ||"



सिद्धबेट मुक्ती आंदोलन


       दिनांक ०८/०७/१९९८ ला आळंदी मधील ज्ञानेश्वर माउलींची पवित्र पावन जन्मभूमी सिद्धबेट येथे काही समाजकंटकांनी तिथली मंदिरे जमीनदोस्त केली
तिथे काही स्वार्थी लोकांना पंचतारांकित हॉटेल्स बांधायची होती. तो परिसर इंद्रायणी व कुबेरगंगा या नद्यांनी सुशोभित व पावन झालेला आहे. सर्व भक्त मंडळी दुःखी झाली. हतबलपणे पाहत राहिली. तक्रार करावी तरी कुणाकडे ? कुणीच त्राता राहिला नाही.सर्व भक्त मंडळी वासुदेव महाराजांकडे आली व त्यांनी सर्व वृत्तांत कथन केला. ती जागा वारकर्यांच्या सोयीची. दरवर्षी तिथे ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यात ज्ञानेश्वरी पारायण होत असे. महाराजांनी सुप्रीम कोर्टापर्यंत लढा दिला. दहा वर्ष केस चालू होती. शेवटी महाराजांचाच विजय झाला. महाराष्ट्र शासनाने सिद्धबेटचा विकास करण्यासाठी निधी मंजूर केला. आता त्याठिकाणी शासनातर्फे बांधकामाला सुरुवात झाली. अश्याप्रकारे आपले आराध्य दैवत श्री ज्ञानेश्वर माउली त्यांची जन्मभूमी सिद्धबेट हे समाज कंटकांच्या विळख्यातून सोडवली.

  योगी परिषद



     गुरुवर्य श्रीसंत वासुदेव महाराज यांचा सेवाभाव हा वा-यासारखा  सर्वदूर पसरत होता. गुरुवर्य महाराजांनी संतचरीत्रा विषयक केलेलं लिखाण आणि त्यातील संशोधनात्मक बाबी ह्या एवढ्या कौतुकास्पद आणि वंदनीय होत्या कि त्याच्या पुढे संपूर्ण वारकरी सांप्रदायचं नव्हे तर दुसऱ्या देशातील महात्मे सुद्धा नतमस्तक झाले.

 महाराजांची कीर्ती ऐकून आणि श्रीसंत गजानन महाराज यांच्या प्रेरणेने १९६८ साली नेपाळ नरेशांचे गुरु योगी श्री नरहरीनाथ शास्त्री हे गुरुवर्य महाराजांच्या भेटीला श्रीसंत भास्कर महाराज संस्थान अडगाव येथे आले. तिथे मोठी  "योगी परिषद" पार पडली. गुरुवर्य महाराजांनी स्वतः 

"आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा |
मछीन्द्र तयाचा मुख्य शिष्य ||"

  या अभंगावर कीर्तन केले. अभंगाच्या निरुपणातून योगी नरहरीनाथ शास्त्री यांच्या शंकेच निरसन केल. नरहरीनाथ यांना खूप आनंद झाला कि एवढ्या महान संतांची भेट मला झाली. त्यांनी संस्कृत भाषेत महाराजांवर गौरवपूर्ण शब्दात आपल्या भावना लिहिल्या व प्रशस्ती पत्र दिले. नरहरीनाथ यांनी गुरुवर्य महाराज लिखित सार्थ अमृतानुभव व श्री संत भास्कर महाराज चरित्र सोबत नेले परंतु त्यांना मराठी कळत नसल्यामुळे त्यांनी ते ग्रंथ रशियन भाषेत छापण्याची परवानगी मागितली.  



निर्याण 


गुरुवर्य श्री महाराज अखेरपर्यंत आत्मबोधावर आरूढ होते.हे गुरुवर्य श्री मारोती महाराज कु-हेकर यांचेशी झालेल्या ज्ञान चर्चेवरून स्पष्ट होते.





                    अवतरण कार्य थांबविण्याची योग्य वेळ आल्याचे महाराजांच्या बोलण्यावरून लक्षात येऊ लागले.सर्व भक्त गणांना बोलउन महाराज निरोपाची भाषा बोलू लागले. 

' आम्ही जातो आमच्या गावा ...'

महाराज पंढरीला निघतेवेळी भक्तांना उद्देशून म्हणाले ... ,"मी तर चांगदेवासारखे चौदाशे वर्ष जगू शकतो परंतु ते निसर्ग नियमनाच्या विरुद्ध होवून काळाची विटंबना होईल.


Caption Text

माझ्यापेक्षा लहान ते सर्वजन देह टाकून निघून जातील मग या इहलोकी दु :खाला पारावर नसेल.जीर्ण शरीर हे टाकावेच लागते तो निसर्गाचा नियम आहे.मी शरीराने गेलो तरी आत्मरूपाने येथे कायम राहील.जनसेवा,भक्तिमार्ग पुढे सुरु ठेवा." 

आषाढ शुद्ध चतुर्थी,शुक्रवार दिनांक २६/०६/२००९ ला नेहमीप्रमाणे शेगांवहून गाडी महाराजांना पंढरपुरला घेऊन जायला आली.मोहोकर कुटुंबियासह अनेक भक्तजनांनी निरोप दिला.सायंकाळी सदगुरू गजानन महाराजांचे दर्शन घेवून शनिवार दि.२७/०६/२००९ ला पंढरपूरला पोहोचले.पंढरीला निघाल्यावर महाराज विठुरायाच्या दर्शनाशिवाय अन्न,पाणी ग्रहण करत नव्हते.तिथे श्री विठ्ठल चरणी नतमस्तक होवून एकच मागणे मागितले.

'हीच व्हावी माझी आस | जन्मोजन्मी तुझा दास |'


     २९/०६/२००९ रोज सोमवारला मारुती महाराज  कु-हेकर महाराजांना भेटायला आले.दोन महात्म्यांची अध्यात्मावर चर्चा झाली.महाराज मारुती महाराजांना म्हणाले,"मला आता सुखाने जावे वाटते."मारुती महाराज उत्तरले,"महाराज तुमचा आधार आम्हाला हवा आहे." त्यावर महाराज म्हणतात,मला माउली कृपेने अजूनही आत्म ज्ञान आहे.असे म्हणून त्यांना परमोच्च ज्ञानाच्या ओव्या व अभंग  सांगितले ....




 'तरी आता देह असो अथवा जावो |
आम्ही तो केवळ सिद्ध वस्तूची आहो |
का जे दोरी सर्पत्व वावो|
दोराचीकडूननी||'



कधी आम्ही आलो स्वरूप सोडून | जावो मिळोन जेथील तेथे ||

 माझिया भक्ता | काय संसाराची चिंता |
समर्थाची कांता  | कोरान्न मागे ||


ते ऋणवैपण देखोनि अंगी | मी आपुलिया उत्तीर्णत्वालागी |

भक्ताचिया तनुत्यागी | परिचर्या करी ||


                        ही   परिस्थिती आहे .



आता झाकिला घटीचा दिवा | काय झाला नेणिजे केव्हा |

या रिती जो पांडवा | देह ठेवी ||


सदगुरू जोग महाराज की  जय ....                    

मला जगाच्या पाऊलावर नको,गुरूंच्या पाऊलावर पाहिजे .गुरुवर्यांची  हे कृपा करायला लावा .जोग महाराज की जय 

असे दिव्य आत्मज्ञान ऐकून मारुती महाराज उपस्थितांना म्हणाले ...


अशा ओव्या त्यांच्या मुखकमलातून निघाल्या त्यांनी सांगितले की वासुदेव महाराजांचा सांभाळ प्रत्यक्ष माउलीच करीत आहे.त्यांची सेवा करणारी भक्त मंडळी धन्य आहे.



                                                        'मज तरंगपण असे कि नसे |
हे उद्कांसी कही प्रतीभासे|
ते भलतेव्हा जैसेतैसे |
उदकची की||'

तरंगाकारे न जन्मेची|
ना तरंगलोपे न निमेची|
तेवी देही जे देहेची |
वस्तू झाले ||'

'मग भलतेथ भल तेव्हा |
देहबंधु असो अथवा जावा |
परी अबंधा नित्य ब्रम्ह्भावा|

बिघाड नाही ||'

मंगळवार दि.३०/०६/२००९ ला संस्थानच्या परिसरात महाराजांचे प्रवचन झाले .ओवी होती ...

"विपाये जरी आठविले चित्ता |
तरी दे आपुली योग्यता |
हे असो तयाते प्रशंसिता |
लाभू आथी ||"

प्रवचनामध्ये गजानन महाराज ,भास्कर महाराज यांचे चरित्र सांगितले .
त्याच रात्री तिथेच महाराजांचे कीर्तन झाले .कीर्तनाला अभंग होता ...

'हिच व्हावी माझी आस |
जन्मोजन्मी तुझा दास |
पंढरीचा वारकरी |
वारी चुकू न दे हरि ||'

त्यामध्ये पंढरीचा आणि पंढरीच्या वारीचा महिमा वर्णन केला.

गुरुवार दि.०२/०७/२००९ आषाढ शुद्ध दशमी ला सकाळी वडील पुंडलीक महाराज जायले यांची पुण्यतिथी श्रींचा नैवद्य व वारक-यांना अन्नदान करून साजरी केली.महाराजांचे ज्ञानेश्वर माउलिंचे स्मरण व चिंतन सुरु होते.रात्री ९ वाजता जमलेल्या भक्त मंडळींना ते विचारीत माउली आली का ? विठ्ठलबुवा इंगळेनी सांगितले कि, माउलिंची पालखी आलेली आहे.भक्तांनी आणलेल्या अजानवृक्षाच्या पानाचे सौ.गीतीताई मोहोकार यांनी चूर्ण करून दिले.महाराजांनी त्याचे सेवन केले.

रात्री ९.४५ वाजता श्री गजानन महाराज संस्थानमध्ये नित्यनेमाच्या कीर्तनाचा गजर झाला.ज्ञानेश्वर माऊली  ज्ञानराज माऊली  तुकाराम | तो गजर ऐकताच  माऊली माऊली म्हणून डोळे मिटले.माऊलींची प्रतिमा आपल्या लोचनी सामावून महाराजांनी अवतार कार्याचा कायमचा निरोप घेतला .या भूतलावरील एक तेजस्वी तारा,भक्तीचा महासूर्य ,ज्ञानाचा दीप कायमस्वरूपी श्री विठ्ठल स्वरुपात विलीन झाले.चालता बोलता चिंतामणी पंढरपूरच्या वाळवंटात हरवला .उपस्थित भक्तमंडळी सैरभैर झाली.एकच आक्रोश सुरु झाला.... दिन जनांचा आधार हरपला. पंढरीच्या वाळवंटात अश्रूंचा महापूर आला.............




दिनजनांचा आधार हरपला.महाराजांनी सहज डोळे मिटले पण लाखो भक्तांना आपल्या डोळ्यासमोर अंधाराचे सामराज्य पसरल्यासारखे वाटले.निसर्ग नियमाचे पालन करून मृत्यूला कवटाळले.

'झाकलीया घटीचा दिवा |
नेणिजे काय झाला केधवा |
या परी जो पांडवा |
देह ठेवी ||

सर्व भक्तांसी चर्चा करून पंढरीत चंद्रभागेच्या वाळवंटात अग्नी संस्कार करायचे ठरवले.आवश्यक सर्व  सोपस्कार पार पाडून श्री गजानन महाराज संस्थान,शेगाव यांनी सर्वतोपरी विधिवत तयारी केली.दि.०३/०७/२००९ रोज शुक्रवार आषाढ शुध्द एकादशीला दुपारी महाराजांच्या पार्थिवाला वेदोक्त स्नान घालून रेशमी सोवळे नेसाविले.त्यांच्यासाठी विमान तयार करून त्यात त्यांना बसवले.श्री गजानन महाराज संस्थान,शेगाव पासून भव्य मिरवणूक निघाली.

'इये शरीराची माती |
मेळवीन तिये क्षिती |
जेथ श्रीचरण उभे ठाती |
आराध्याचे ||

ज्ञानेश्वर माउलींच्या अवतारात व्यक्त केलेली इच्छा या अवतारामध्ये पूर्ण केली.तुळशीची लाकडे,चंदन,तुपासह चिता रचून ची.पुरुषोत्तम मोहोकर आणि मोहन जायले यांनी पवित्र मंत्रघोषात चिताग्नी दिला.चंद्रभागेचा सुपुत्र चान्द्रभागेच्याच कुशीत कायमचा विसावला.एक दिव्यं तेजस्वी ज्योत ब्रम्ह्ज्योतीत विलीन झाली.









♣  श्री संत वासुदेव महाराजांची आरती ♣



आरती वासुदेवा भक्ती ज्ञानाचा ठेवा |
संपादोनी आत्मज्ञान उद्धरीले जडजीवा ||धृ||

श्री भास्कर मंदिराचा तुम्ही जीर्णोद्धार केला |
ग्रंथ लिहूनी यथार्थ मार्ग भक्तीचा दाविला ||१||

आकोलीस मंदिर केले सर्व भक्त आनंदले|
ज्ञानेशप्रसाद प्रेमे तुमच्या चरणावरी लोळे ||२||